टाटा एअरबस प्रकल्पावरुन आरोपांची उड्डाणे; सत्ताधारी, विरोधकांचे टीकास्त्र

| मुंबई | प्रतिनिधी |

टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्यावरुन सत्ताधारी शिंदे सरकार विरुद्ध विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर हे प्रकल्प ठाकरे सरकारमुळेच गेल्याचा प्रत्यारोप सत्ताधारी शिंदे, फडणवीस सरकारने केला आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता सी 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेला आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.

भाजपचे ट्विट
भाजपने ट्विट करत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच एअरबस टाटा गुजरातमध्ये गेली. असा आरोप भाजपने केला आहे. तसेच, भाजपने ट्विटची मालिका शेअर करत या प्रोजेक्टबद्दल मोठा खुलासा केला आहे.

टाटा एअरबसच्या प्रकल्पासंदर्भातील सर्व करार हे वर्षभरापूर्वी झाले आहेत. पण आता आगामी प्रकल्प महाराष्ट्रात यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

किरण पावसकर
शिंदे गटाचे प्रवक्ते

राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे, फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे.

नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Exit mobile version