जलसंजीवनी प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम
| नेरळ | प्रतिनिधी |
आदिवासी आणि ग्रामीण भागात जलसंजीवनी अभियानचे माध्यमातून तेथील लोकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी युनायटेड वे ही संस्था कार्यरत आहे. युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारे कार्यान्वयित जल संजीवनी प्रकल्प, कर्जत अंतर्गत पाथरज ग्रामपंचायतीमधील नागेवाडी येथे येथील सर्व उपक्रमांचा ‘कृती दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी नागेवाडी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. शिक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक विषयांचे फलक हातात धरून विविध घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, सेंद्रिय खत जीवामृतचा वापर, पाणी अडवणे, स्वच्छता, शौचालयाचा वापर यांसारख्या आवाहन करण्यात येत होते. प्रभात फेरीनंतर दशरथ विष्णू आगिवले यांच्या शेतात सर्वांच्या हस्ते 50 झाडे लावण्यात आली. झाडांना कीड आणि वाळवी लागू नये म्हणून कीडनाशक क्लोरोपायरीफॉस आणि बुरशीचे रोग होऊ नये म्हणून शेतकर्यांची मित्र बुरशी असलेली ट्रायकोडर्माचा आवर्जून वापर यावेळी करण्यात आला. तर, लागवड करण्यात आलेल्या झाडांची वाढ व्हावी म्हणून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले गांडूळखत वापरण्यात आले.
सदर उपक्रमास नागेवाडी येथील 40 विद्यार्थी तसेच शिक्षक, स्थानिक तरुण, ग्रामस्थ महिला, शेतकरी आणि जलसंजीवनी प्रकल्पामधील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.