। अलिबाग । प्रतिनिधी ।
मतदार याद्या अद्ययावत करण्याचा गाजावाजा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात केला. परंतु, मयत यांच्यासह मुंबई, पुणे येथे मतदारांची दुबार नावे मतदार यादीत कायमच राहिली. त्याचा फटका या निवडणुकीत बसल्याने मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे. त्याला जबाबदार प्रशासनच असल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाने गांभीर्याने लक्ष देऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदार यादी अद्ययावत करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
रायगड लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रीया मंगळवारी पार पडली. 16 लाख मतदारांपैकी 10 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी यंत्रणा कामाला लागली. ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी उपक्रम राबवून मतदान जनजागृती करण्यात आली. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, या निवडणुकीत प्रतिसाद फारच कमी मिळाल्याचे दिसून आले आहे.
मतदान करण्यासाठी गेलेल्या काही मतदारांची मतदार यादीत नावच नसल्याचे दिसून आले. काही मतदार मयत नसताना मयत दाखविण्यात आले. तर काही मतदार मयत असतानादेखील त्यांचे मतदार यादीत नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत असणार्या अनेक मतदारांची नावे बाहेरच्या ठिकाणीदेखील आहेत. दुबार मतदाराबरोबरच मयत मतदारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा बोध घेत आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी मतदार यादी अद्ययावत करावी. मतदार याद्यांची पडताळणी पुन्हा करण्यात यावी, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.