| पुणे | प्रतिनिधी |
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचे सावट आता दूर झाले आहे. गावकऱ्यांनी आळंदी बंदचा निर्णय मागे घेतल्यानंतर बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी गावकऱ्यांनी बंदचा निर्णय मागे घेतला. संध्याकाळी अलंकापुरीत दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांचेही ग्रामस्थांनी स्वागत केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. स्थानिकांना विश्वस्त पदी डावलण्यात आल्याने बंदची हाक देण्यात आली होती. आळंदी सकाळपासून ठप्प होती, परंतु मंदिर परिसरातील हार-फुलांची दुकाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी खुली होती. मात्र हैबतबाबांच्या पायरीचे पूजन होताच ही दुकाने बंद करण्यात आली.
आळंदी बंदच्याच पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. पण तोपर्यंत लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले होते. या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थानच्या विश्वस्तांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले. मात्र त्यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केल्याने विश्वस्तांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दुसरीकडे मोठी गैरसोय होत असल्याचा नाराजीचा सूर वारकऱ्यांमधून उमटू होता.
ज्या वारकऱ्यांमुळे आळंदीला महत्व प्राप्त झाले आहे त्यांना आता त्यांना फार काळ वेठीस धरणे योग्य नसल्याची बाब लक्षात आली. विश्वस्त पदी एक तरी स्थानिक असावा, ही मागणी रास्त असेलही. पण त्यांना विश्वस्तपदी स्थान द्यायचे की नाही, हे घटना ठरवू शकते, असे नवनिर्वाचित विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी सांगितले.