सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग मुरुड रस्त्यासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सदर रस्त्याचे काम रखडले असल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी कृषीवलला दिली. सातत्याने अलिबाग मुरुड रस्त्याच्या कामावरुन राजकारण करणार्यांना यामुळे चपराक मिळाली आहे. राज्य शासन निधीच वितरीत करीत नसल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे कागदावरच विकास कामे करणार्यांचे पितळ उघड पडले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, तत्कालिन आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नांतून पेझारी नागोठणे तसेच अलिबाग रोहा रस्त्याचे काम मार्गी लागले. मात्र निवडणूकीत दोन दिवसात स्वखर्चाने रस्त्याचे काम करण्याच्या वल्गना करणार्या शिवसेना आमदारांना प्रत्यक्षात दोन वर्षात या रस्त्यांचे काम करता आले नाही. त्यासाठी शेकापने आंदोलन करताच रस्त्याची दुुरुस्ती सुरु झाली. त्यामुळे हताश झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी शेकाप नेत्यांनी अलिबाग मुरुड रस्त्यासाठी आंदोलन करुन दाखवावे असे आव्हान दिले होत. त्यावर कृषीवलने वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क साधला असता कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी सदर रस्त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले. निधी उपलब्ध होताच सदर रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
सदर रस्त्यासाठी 7.5 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. त्यापैकी 2.5 कोटी रुपये अदा करण्यात आले असून 3 कोटी रुपयांचा निधी अद्यापही वितरीत करण्यात आलेला नाही. त्यात नजिकच्या काळात झालेल्या दरवाढीमुळे डांबर डिफरन्सचे 35 लाख अतिरिक्त खर्च झाले आहेत. तसेच मोठया प्रमाणावर डिझेल दरवाढ झाल्याने वाहतूक खर्चात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने मंजूर केलेला निधी वितरीत झाल्यानंतर या रस्त्याचे काम सुरु होऊ शकेल.