अलिबागच्या कलाकारांची सिनेक्षेत्रात उंच भरारी

आषाढ सिनेमाचे उद्या प्रदर्शन
। सायली पाटील । अलिबाग ।

सिनेमा क्षेत्रात अलिबागचे कलाकार भरारी मारत असून, अलिबागमध्येच बनवलेला आषाढ हा पूर्ण लांबीचा चित्रपट आषाढी एकादशीचे औचित्य साधत रविवारी (10 जुलै) रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीचे औत्सुक्य निर्माण झालेले आहे.

मनिष अनसुरकर निर्मित, लिखीत व दिग्दर्शित आषाढ या चित्रपटाचा ट्रेलर, आषाढी एकादशी निमित्त विविध समाज माध्यमांवर प्रदर्शित होत आहे.कोकणच्या मातीतली कथा घेऊन, आपल्याच अलिबाग सभोवतालच्या चौल, नागाव सारख्या निसर्गरम्य परिसरात चित्रीत केलेला आषाढ हा चित्रपट पंढरपूरच्या वारीची आगळी वेगळी कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपट 1960-65 सालातली गोष्ट मांडण्यात आली आहे. चौलमध्ये घडलेल्या गोष्टीचा आधार घेत वारी, विठ्ठलभक्ती, त्याकाळची नष्ट होऊ घातलेली खोत परंपरा, कोकणी लोकांचा देवभोळेपणा, प्रेमळ, भोळ्या माणसांच्या भावभावनांतून जपले गेलेले नातेबंध आणि अखेर देव की दैव या चिरंतन आणि अनुत्तरित प्रश्‍नावर गुंफलेले मनोवेधक कथानक म्हणजे आषाढ हा चित्रपट. युट्युबवर प्रदर्शित होत असणार्‍या या चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाचा उत्कृष्ट असा तांत्रिक दर्जा, दर्जेदार छायाचित्रण, आशयघन कथा या पैलूंची प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून प्रचिती येत आहे. सर्व स्तरातून, अनेक रसिक मान्यवरांकडून चित्रपटाबद्दल भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

या चित्रपटास रूढार्थाने कोणीही निर्माता नाही. अलिबागमधील नामांकित अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञ हेच सर्व या कलाकृतीचे निर्माते. सर्वांनी मिळून ही कलाकृती निर्माण केली आहे आणि आपल्या अलिबागमधून निर्मिलेली उत्कृष्ट दर्जाची ही कलाकृती नक्कीच लोकांना आवडेल असा विश्‍वास आज ट्रेलर पाहणार्‍या सर्वांना नक्कीच वाटणार असा विश्‍वास आषाढच्या टीमने व्यक्त केला आहे. अलिबागमधीलच मयुरी स्वामी, ज्योती राऊळ, सागर नार्वेकर, श्रद्धा पोखरणकर, आनंद पाटील, चंद्रशेखर लिमये, विश्‍वास तांबोळी, वसुंधरा पोखरणकर, प्रकाश कवळे, गौरांगी पाटील आदी कलावंतांनी यामध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. आषाढ चित्रपटाची निर्मिती एक्स्प्रिंमेंटल मुव्हीज या निर्मिती संस्थेतर्गत, संदीप वाटवे फोटो अँड फिल्म्स, केएफएक्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.कर्तव्य मोकल यांचे संकलन, व्हिएफएक्स व सह दिग्दर्शन, संदीप वाटवे, सिद्धांत पाटील यांचे उत्कृष्ट छायाचित्रण, शुभम म्हात्रे याचे सेट डिजाईन, हिमालय चोरघे निर्मिती सूत्रधार, सुनील म्हात्रे यांचे पार्श्‍व संगीत व ध्वनी संयोजन, श्रद्धा पोखरणकर यांची पटकथा, सह दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा व पटकथा-संवाद सूचित पाटील, मेधा जोशी, विश्‍वास तांबोळी यांनी लिहिले आहेत.संत ज्ञानेश्‍वर, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत तुकाराम आदी संतश्रेष्ठांच्या अभंग रचना मनिष अनसुरकर यांनी संगीतबद्ध केल्या असून प्रज्ञा अभंगे, सागर नार्वेकर, विशाल अभंगे, महेंद्र पाटील यांनी गायल्या आहेत. सुशांत नाईक, मयुरेश सवतीरकर सहाय्यक छायाचित्रण, मयूर शिंदे, शुभम पान पाटील, कुणाल तिर्लोटकर, राहुल अवचार यांची प्रकाश योजना, अमित पाटील निर्मिती व्यवस्थापन, सुजित पाटील, प्रसाद लोध, नम्रता भगत, ऋतिक जैन, मयुरेश काबाले, संजय काबाले, चौल यांनी निर्मिती सहाय्यक म्हणून काम केले आहे.

आषाढच्या या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असली, तरी सध्या हा चित्रपट विविध नामांकित चित्रपट महोत्सव आयोजकांकडून निमंत्रित होत आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्यानंतर मग हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यास योग्य त्या माध्यमाद्वारे प्रदर्शित होईल.

संदीप वाटवे, छायाचित्रका
Exit mobile version