अलिबागचे ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्रा. डॉ. गंगाधर पाटील कालवश

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मराठी समीक्षेत पाटील स्कूल्सचा ठसा उमटविण्यात मोलाचा वाटा असणारे अलिबागचे ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ गंगाधर पाटील (वय 93) यांचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा व सून, मुलगी, जावई ,नात,नातू तसेच पुतणे असा परिवार आहे.

मराठी समीक्षेत वा. ल. कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी, द. भि. कुलकर्णी अशा ङ्गकुलकर्णी स्कूल्सफचा दबदबा असताना अलिबाग तालुक्यातील खिडकी या छोट्या खेडेगावासारख्या ग्रामीण भागातील गंगाधर पाटील आणि म. सु. पाटील या दोन पाटलांनी पाटील स्कूल्स निर्माण केले. प्रा. गंगाधर पाटील यांनी पाश्‍चात्त्य साहित्य विचार व समीक्षा मराठीत आणली. आदिबंधात्मक समीक्षा हा विचार मराठीत रुजवला तो ङ्गपाटील स्कूल्सफनेच. त्यात प्रा.डॉ गंगाधर पाटील यांचा मोलाचा वाटा होता.

आदिबंधात्मक समीक्षा ही समीक्षापद्धती गंगाधर पाटील यांनी मराठीत रूढ केली. पु. शि. रेगे यांच्या सुहृदगाथेची प्रस्तावना ही मराठीतल्या उत्कृष्ट प्रस्तावनांमधील एक प्रस्तावना आहे. पु. शि. रेगे यांनी अनुष्टुभमध्ये सुरू केलेले ङ्गरेखेची वाहाणीफ हे सदर पुढे गंगाधरमामांनी सुरू ठेवले आणि ते खूप गाजले. आज मराठी समीक्षेत गांभीर्याने आणि अधिकाराने लिहिणारे अभ्यासक कमी होण्याच्या काळात गंगाधर पाटील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी प्रकर्षांने जाणवते.

नीरजा, कवयित्री

प्रा. गंगाधर पाटील यांनी आलोचना मासिकातून समीक्षा लेखनाला सुरुवात केली. त्यांचे अनुष्टुभ या वाङ्मयीन नियतकालिकातील रेखेची वाहाणी या समीक्षापर सदराचे मराठी साहित्यवर्तुळात खूप कौतुक झाले. त्यांनी आदिबंधात्मक समीक्षेतून पु. शि. रेगे यांच्या कवितेची केलेली अभ्यासपूर्ण समीक्षा खूप गाजली. पु. शि. रेगे यांच्या निवडक कवितांचे संपादन करून त्याला अभ्यासपूर्ण प्रस्तावनेची जोड देत सुहृदगाथा हे पुस्तक प्रसिद्ध केले. आलोचनाफ, मौज, अनुष्टुभ, पाऊलवाट या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखांचा संग्रह समीक्षेची नवी रूप, समीक्षा मीमांसा आणि कलाकृती आणि समीक्षा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. समीक्षापर या तीनही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.

विद्यापीठाच्या मराठी विभागाचे हे भाग्यच मानले पाहिजे की, पाटील सरांसारखा एक विद्वान या विभागाला लाभला. सरांचे साहित्य समीक्षेसंबंधीचे लेखन तीन पिढयांसाठी मार्गदर्शक ठरले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना साहित्याच्या आकलनासाठी योग्य दृष्टी आणि समीक्षेसाठी नवा विचारव्यूह दिला.अशी शोकमग्न प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. पुष्पा राजापुरे यांनी व्यक्त केली तर गंगाधर पाटील यांनी मराठीला युरोपीय साहित्य विचाराची ओळख करून दिली. त्या काळात त्यांनी मराठी साहित्याला संरचनावाद, उत्तर संरचनावादाची दृष्टी दिली. या गोष्टी त्यांच्या लेखनात आणि शिकवण्यातही मुरलेल्या असत. त्यांच्यामुळे मराठी समीक्षेत चांगल्या प्रवृत्ती आल्या. 80 च्या नंतरच्या कालखंडात त्याचा मराठी समीक्षेवर खोलवर परिणाम झालेला दिसून येतो.

डॉ. हरिश्‍चंद्र थोरात, ज्येष्ठ अभ्यासक

अफाट व्यासंग आणि विचारातला खुलेपणा हा स्थायीभाव असलेल्या पाटील सरांनी भारतीय आणि पाश्‍चात्त्य ज्ञानदृष्टींच्या आधारे आदर्शवत समीक्षा कशी आकार घेऊ शकते ते त्यांच्या लेखनातून सिद्ध करून दाखवले. मराठी नवसमीक्षेचे ते खरेखुरे नायक होते.

विजय तापस, ज्येष्ठ समीक्षक
Exit mobile version