विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या
। हिंगोली । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत. हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपलं जीवन संपवलं आहे. या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय?, असा त्याने उल्लेख केला आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचा सत्र थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील आजरसोंडा येथील राखोंडे (27) या युवकाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य हा उच्चशिक्षित होता. मात्र, असे असतांना नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदित्यचा सहभाग होता.
मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय? एक मराठा लाख मराठा… मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आत्महत्या? मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे देखील संजय साईनाथ सोनवणे (39) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने विषारी द्रव पिऊन स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे.