। पनवेल । प्रतिनिधी ।
तालुक्यात शेकापची ताकत नक्कीच मोठी आहे. अडचण कुठलीही असो, सत्ता असो की नसो, शेकापच्या कार्यकर्त्यांपर्यत पोहोचला की काम झालंच समजा, असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी करंजाडे वसाहतीतील शेकापच्या नव्या पदाधिकारी नियुक्त्या कार्यक्रमामध्ये रविवारी (दि.21) बोलताना सांगितले. यावेळी माजी नागराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, तालुका चिटणीस राजेश केणी, शेकापनेते वामन शेळके, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, बबन गायकर, मंगेश बोरकर यांच्यासह कार्यकर्ते, महिला सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय राजकारणामध्ये शेकापची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. महाराष्ट्रामध्ये या पक्षाला विशेष स्थान आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये आजही हा पक्ष प्रबळ ठरला आहे. शेतकरी व कामगार यांचे हित जोपासणारा विचार मांडणारा, योजना सुचविणारा असा पक्ष ओळखला जात आहे. त्याचबरोबर या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे करंजाडे ग्रामपंचायतीचा माजी सरपंच रामेश्वर आंग्रे असल्याचे मा.आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.
त्याचबरोबर राजकारणामध्ये हार जीत होत असते. मात्र, त्या हार-जीतवर आपल्या कामाचे मूल्यमापन होत नसते, आपण किती निष्ठेने चांगले काम करतो, त्याच्यावरच पक्षाचं, समाजाचा स्थान घडत असतं, असे मत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.
आपण महिलांना त्यांचा हक्क देत असतो. साडेबारा टक्के मिळाले ते दिबा पाटील साहेबानंमुळे मिळाले, त्यामुळे लढल्यामुळे काहीच मिळत नाही. पाण्यासाठी महिलांनी आघाडी घेतली. करंजाडेकरांनी मोठी चूक केली ती म्हणजे चांगल्या कार्यकर्त्याला पाडलं. त्यामुळे इमानदारीला किंमत राहिली नाही. तरुणांना आज नव्याने संधी दिली जात आहे. त्यांनी जोमाने काम करावे, मात्र कोणत्याही क्षेत्रात हरल्याशिवाय जिंकता येत नाही. त्यामुळे पदाधिकार्यांनी चांगले काम करावे.
जे.एम.म्हात्रे, माजी नगराध्यक्ष, पनवेल