। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेल्यामुळे येथील सुपारीचे पीक धोक्यात आले आहे. वाढत्यातापमानामुळे सुपारीच्या झाडांना नुकतीच फलधारणा होऊन तयार झालेली छोटी छोटी फळे गळून पडू लागली असून सुपारीच्या छोट्या झाडांच्या पानांवर (झावळ्यांवर) करपा सदृश रोग पडल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे सुपारी पीक धोक्यात आले आहे.
मुरूड तालुक्यात 416 हेक्टरवर सुपारीची लागवड करण्यात आली असून जवळपास 1500 सुपारी बागायतदार आहेत.ते सर्वजण प्रती वर्षी 400 ते 450 खंडी (1 खंडी = 400 की.ग्रॅ.)असोली सुपारी पिकवतात. निसर्ग वादळात सुपारीचे 141 .36 हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्यामुळे या उत्पादनात मोठी घट आली झाली आहे. त्यात सुपारीच्या झाडांसह फळेही दरवर्षी त्यांना ग्रासणार्या विविध रोगांना बळी पडत आहेत.
चालूवर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला. एप्रिल महिन्याच्या अखेरीस तर तापमानाने चाळीस अंशाचा आकडाही पार केला होता. सुपारीच्या झाडांना अति उष्णता सहन होत नाही. याच हंगामात या वाड्या बागायतींमधील झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरी तळ गाठतात. यावेळी पाणी काढण्यासाठी विहिरींवर बसवण्यात आलेले पंप पाण्याचा उपसा करताना नजिकच्या समुद्राच्या पाण्यातील क्षार खेचतात क्षारयुक्त पाणी व वाढत्या तापमानाचा वाईट परिणाम सुपारी झाडे-फळांवर होऊन फळ गळ, करपासारख्या रोगांना ती बळी पडत आहेत व उत्पादनात घट होत आहे. फेब्रुवारी -मार्च महिन्यात झाडांना लागलेली छोटी छोटी फळे तप्त वातावरणात गळू लागतात. या कालावधीत पाण्याची कमतरता भासल्यास गळ अधिक होते. बागायतदारांचे अतोनात नुकसान होते. या खेरीज सुपारी झाडांना भेडसावणार्या अन्य अनेक रोगांनीही या उत्पादनावर परिणाम होत आहे. या सर्व रोगांवर दापोलीच्या कृषी विद्यापीठांतून संशोधन होऊन त्यावरील उपाययोजनांची माहिती बागायतदारांना करुन देणे गरजेचे आहे.