पक्षी अभ्यासक, पर्यटक सुखावले
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली सुधागड सह रायगड जिल्ह्यात लांबलेला पाऊस व प्रतिकूल हवामानाचा पक्षांच्या स्थलांतरावर परिणाम झाला होता. मात्र, आता वातावरणात अनुकूल बदल झाले आहेत. थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होत आहेत. या पक्षांसाठी वातावरण अनुकूल झाले आहे. थंडीही चांगली पडू लागली असल्याने हे स्थलांतरीत व स्थानिक पक्षी स्थिरावले आहेत. त्यामुळे पक्षी अभ्यासक, निरीक्षक व पर्यटक सुखावले
स्थलांतरित पक्षांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असल्याने स्थलांतरित पक्षी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने निसर्गरम्य रायगड जिल्ह्यात परदेशी स्थलांतरित पक्षी आणि काही स्थानिक स्थलांतरित पक्षांची रेलचेल पाहायला मिळत आहे. गवतामधील कीटक व आळ्या खाण्यासाठी आणि साठलेल्या जलाशयामधील पाण्यातील कीटक, कृमी, मृदुकाय जीव-जंतू खाण्यासाठी तसेच समुद्र किनारे, दलदलीचे भाग यामधील छोटे खेकडे, मृदुकाय प्राणी, मासे, जल कीटक हे खाऊन पर्यावरणाचे संरक्षण व जैवविविधता समृद्ध करण्यात हे पक्षी महत्वाची भूमिका बजावत असतात. या पक्षांचे दर्शन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, दलदलीच्या जागा, जंगले, भातशेते, खाड्या तसेच गवताळ प्रदेशात होत आहे. परिणामी पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना तसेच पर्यटकांना ही मोठी पर्वणीच आहे.
रायगड जिल्ह्यात 400 हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद आहे. स्थलांतरित पक्षांसाठी येथे अनेक प्रकारचे पोषक नैसर्गिक अधिवास आहेत. त्यामुळे चांगल्या संख्येने पक्षी दाखल होतात. समुद्रकिनारे, पाणथळीचे प्रदेश, घनदाट जंगले, माळराने अशा अधिवासांमध्ये विविध प्रकारच्या पक्षी प्रजाती जिल्ह्यात थंडीच्या मोसमात येतात. पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी ही गुलाबी थंडी पर्वणीच असते.
शंतनु कुवेसकर,
पक्षी निरीक्षक व वन्यजीव अभ्यासक, माणगाव
परदेशी स्थलांतरित पक्षांचा बोलबाला
ब्ल्यू थ्रोट (शंकर) युरोपियन रोलर (तास पक्षी), युरेशियन रायनेक (मानमोडी) सायबेरियन स्टोनचाट (गप्पीदास पक्षी), बंटिंग्स (भारीट पक्षी), पॅलिड हॅरिअर (पांढूरका भोवत्या) या परदेशी स्थलांतरित पक्षांचा बोलबाला येथे पहायला मिळतो.
स्थानिक पक्षांचे आगमन
पॅराडाईज फ्लाय कॅचेर ( स्वर्गीय नर्तक), इंडियन रोलर(भारतीय तास पक्षी), श्राईक (खाटीक), युरेशियन हुपू (हुदहुद), क्रेस्टेड बंटीग (युवराज) या स्थानिक पक्षांचे आगम सुरु झाले आहे.
समुद्रकिनारे गजबजले
पक्षी अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी सांगितले हजारो किनारी पक्षी महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या पाणथळ प्रदेशात आणि वालुकामय किनाऱ्यांवर येतात. हे स्थलांतर हा एक उल्लेखनीय प्रवास आहे, ज्यामध्ये पक्षी त्यांच्या प्रजननाच्या ठिकाणापासून हजारो किलोमीटर प्रवास करून सायबेरिया आणि उत्तर युरोप सारख्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी किंवा चीनमधूनही उष्ण हवामानात मुबलक अन्न स्रोत शोधण्यासाठी भारतात येतात. भारतातील हिवाळी पक्षी मध्य आशियाई फ्लायवे वापरतात. येथील समुद्र किनारी प्रामुख्याने तुतवार, चिखल्या, कुरव, व्हिमब्रेल्स, लहान कोरल, युरेशिअन कोरल, सामान्य टीलवा, हिरवा तुतवार, पाणलावे, सुरय, समुद्री काळे बगळे आणि कालवफोडे आणि चिंबोरी खाऊ, रंगीत भाट तितर हे असामान्य पक्षी आहेत. पक्षी छायाचित्रकार या पक्षी हालचालींच्या कृती छायाचित्रबद्ध करण्याच्या संधीचा आनंद घेतात.
जगण्यासाठी प्रवास उत्तर गोलार्धातील युरोप ,रशिया आणि उत्तर अमेरिका यासारख्या देशात थंडीच्या दिवसात पडणाऱ्या बर्फामुळे जमिनीवरील भूभाग हा बर्फाने आच्छादलेला असतो. त्यामुळे पक्षांना खाद्य मिळणे कठीण होऊन जाते म्हणून हे पक्षी विविध देशात स्थलांतर करून आपली उपजीविका भागवतात. तसेच आपल्याकडे पडणारी थंडी आणि पुरेशा प्रमाणात मिळणारे खाद्य तसेच योग्य अधिवास या सर्व कारणांमुळे या पक्षांन आपली घरटी बांधून पिल्लांचे संगोपन करणे सोपे जाते. म्हणून बऱ्याच स्थलांतरित पक्षांचा विणीचा काळ सुद्धा हाच असतो.







