| हांगझो | वृत्तसंस्था |
कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आज शनिवारपासून अधिकृतरीत्या सुरुवात झाली आहे. अर्थात, काही क्रीडा प्रकारांना यापूर्वीच सुरुवात झाल्यामुळे उद्घाटन सोहळा हेच आजच्या दिवसाचे खास आकर्षण होते.
भारताचे यंदाच्या स्पर्धेत आशियाई स्तरावरील आपली ताकद दाखवून देण्याचे लक्ष्य असेल. ‘इस बार सौ पार’ अशा घोषवाक्यासह भारताचे पथक चीनमध्ये दाखल झाले आहे. यंदा भारताने आजवरचे आपले सर्वात मोठे 655 खेळाडूंचे पथक आशियाई स्पर्धेसाठी पाठवले आहे. इंडोनेशियात 2018 मध्ये झालेल्या गेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 70 (16 सुवर्ण, 23 रौप्य, 31 कांस्य) पदकांची कमाई केली होती. या वेळी हा आकडा शंभरी गाठणार असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत.
स्पर्धेत 40 क्रीडा प्रकारांचा समावेश असला तरी भारत 39 क्रीडा प्रकारांत सहभाग घेणार आहे. कोरियात 1986 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला होता. मात्र, त्यानंतर भारत पहिल्या पाचात येऊ शकलेला नाही. हे चित्र या वेळी बदलण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेहमीच ॲथलेटिक्स आणि कुस्तीने भारताची पदके वाढवली आहेत. या वेळीही ॲथलेटिक्समध्ये निश्चित आशा आहेत, पण कुस्तीमधील पदकांबाबत कमालीची धाकधूक आहे. जागतिक स्पर्धेतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर मल्ल सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्यावर वेगळेच दडपण असेल.