शेतकरी ४० टक्के भाजला
। मुंबई । वार्ताहर ।
शेतीच्या वादातून शेतकऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना येवला तालुक्यातील कूसुर गावात घडली आहे. कुसूरमध्ये जमिनीच्या बांधाच्या वादातून दोन जणांनी एका शेतकऱ्यावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संग्राम मेंगाळ आणि राहुल हिंगे या दोघांना अटक केली आहे. दिलीप शेषराव गायकवाड हे कुसूर येथील म्हसोबावाडी रस्त्यावर राहतात. त्यांच्या शेतातील जमिनीचा बांध फोडून ३० ते ४० फूट जमीन आरोपींनी नांगरली होती.
याबाबत ते आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेले असता आरोपींनी पाण्याच्या बाटलीतून डिझेल आणून गायकवाड यांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवले, अशी तक्रार जखमी शेतकऱ्याने केली असून त्याप्रमाणे येवला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून २ जणांना अटक केली केली. तर आगीत भाजलेल्या दिलीप गायकवाड यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ते ४० टक्के भाजले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.