| मुंबई | प्रतिनिधी |
दोन अज्ञात महिलांनी मुंबईमधील वांद्रे येथील एका शाळेतून दोन लहान मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. शाळेच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या महिला संबंधित मुलांच्या नातेवाईक असल्याचा दावा करून त्यांना शाळेतून सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होत्या.
तक्रारदार महिला अफरोज उस्मनन अली शेख (28) ही वांंद्रे परिसरात राहते. तिला 7 आणि 5 वर्षांची दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले वांद्रे येथील एका प्रतिष्ठीत शाळेत शिक्षण घेत आहेत. बुधवारी दोन्ही मुले नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. त्यावेळी दोन अज्ञात महिला शाळेत आल्या. दोन्ही महिलांनी बुरखे परिधान केलेले होते. आम्ही या मुलांच्या आजी आणि आत्या असल्याचे त्यांनी सांगितले. कौटुंबिक कारणांमुळे यापुढे मुलांना शाळेत शिकवायचे नाही. आम्ही त्यांना घेऊन जायला आलो आहोत, असे त्यांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. मुलांचा शाळा सोडल्याचा दाखला द्या, असेही त्या म्हणाल्या. यामुळे शाळा व्यवस्थापनाला संशय आला. शाळेने या दोन्ही मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. या दोन्ही महिला मुलांना घेऊन जाण्यासाठी शाळेतील शिक्षकांबरोबर वाद घालून लागल्या. दरम्यान, शाळेतील एका शिक्षकाने मुलांच्या आईला फोन करून त्वरित शाळेत येण्यास सांगितले. त्यामुळे या दोन्ही महिला लगेच शाळेतून पसार झाल्या. मुलांच्या पालकांव्यतिरिक्त कुणाही नातेवाईकांकडे आम्ही मुलांना सुपूर्द करत नाही, असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. त्या दोन महिलांच्या दबावाला बळी न पडता शाळेने मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यास ठाम नकार दिला. शाळेत मुलांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या त्या दोन अज्ञात महिलांविरोधात वांद्रे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.