| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाका येथील मुख्य चौकात उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यासाठी मुख्य रस्ता बंद करण्यात आला असून, पावसाळा तोंडावर आला असताना. उड्डाण पूल बनविण्यासाठी प्रशासनाला जाग आली आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे वाहतूक दोन्ही बाजूला कमकुवत असणार्या सर्व्हिस रोडवरुन वळवण्यात आली आहे. परंतु, या दोन्ही बाजूचे रस्ते एवढे कमकुवत आहेत की, ते खचल्यामुळे वाहनचालकांसह या मार्गानी प्रवास करणार्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
पावसाळा संपल्यानंतर पाच महिन्यांत आंबेवाडी नाका येथील उड्डाण पुलाचे काम सुरु केले नाही. परंतु, दुसरा पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवस राहिले असून, आंबेवाडी नाक्यावरील मुख्य रस्ता बंद करुन उड्डाण काम सुरु करण्यात आले. परंतु, या अगोदर सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम हे सिमेंट काँक्रिटने पक्के करणे गरजेचे होते; परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.
आंबेवाडी बाजापेठेत थोडा पाऊस पडला तरी पुराची परिस्थिती निर्माण होते. याला कारण दोन्ही बाजूला बनवले गटार हे उंचावर व रस्ता खाली असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. यात भरीत भर म्हणून गोदी नदीजवळील गटाराचे काम अर्धवट स्थितीत असून, यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. निद्रावस्थेत असलेले प्रशासन व प्रशासनाचा ठेकेदारावर वचक नसल्यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, खचलेल्या रस्त्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त केली जात आहे.