। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरात सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पर्यटकांची संख्या खूप कमी झालेली आहे. त्यामुळे समुद्रकिनार्यावरती असणार्या घोडा गाड्या किंवा घोड्याची सवारी करणार्या घोड्यांना सध्या काम नसल्याने मोकाट सोडून देण्यात आलेले आहे. घोड्यांच्या श्रीवर्धन शहरातील मुक्त संचारामुळे शहरातील नागरिक त्याप्रमाणे शेतकरी, बागायतदार प्रचंड प्रमाणात त्रस्त झाले आहेत. एका वेळेला पंधरा ते वीस घोड्यांचा कळप नारळ, सुपारीच्या वाड्यांमध्ये घुसतो व त्या ठिकाणी असलेल्या झाडांचे नुकसान करतो. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी असलेल्या भात शेतीमध्ये देखील घोडे घुसत असून शेतीचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
काही वर्षांपूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेकडे कोंडवाडा उपलब्ध होता. त्यामुळे पकडून आणलेले घोडे किंवा गुरे कोंडवाड्यात ठेवली जात असत. संबंधित प्राण्यांचा मालक आल्यानंतर त्याच्याकडून रीतसर दंड वसूल केला जात असे. त्याची त्याला पावती देखील दिली जात असे व त्यानंतरच पकडलेली गुरे किंवा घोडे यांना सोडण्यात येत असे. परंतु, नगर परिषदेने कोंडवाड्याच्या जागी पर्यटक निवास बांधल्याने श्रीवर्धन नगरपरिषदेचा कोंडवाडा रद्द बातल निघाला आहे. त्यामुळे घोडे पकडले तर ठेवायचे कुठे, हा प्रश्न नगरपरिषद प्रशासनासमोर आहे. तसेच, घोडे हे उनाड फिरत असल्यामुळे ते अनेक ठिकाणी आपली विष्ठा टाकत असतात. त्यामुळे परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरत आहे.