। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
श्रीलंका दौर्यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. टी-20 संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. शुभमन गिलला एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही फॉरमॅटचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. या दौर्यातूनच संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर जबाबदारी स्वीकारणार आहेत. पण भारतीय संघाच्या नावाची घोषणा झाल्यापासून संघ निवडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवण्यावर आणि झिम्बाब्वे दौर्यावर चांगली कामगिरी करणार्या अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांना संघातून वगळण्यावर दिग्गज माजी खेळाडूंकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता भारताचे माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथने आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. बद्रीनाथने ऋतुराज गायकवाडला दोन्ही संघात स्थान न मिळाल्याने आणि रिंकू सिंगला एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने वादग्रस्त टिप्पणी केली आहे. एका कार्यक्रमात तो म्हणाला की, काहीवेळा असे दिसते की कामगिरीव्यतिरिक्त, संघात निवड होण्यासाठी तुम्हाला दुसरी प्रतिमा आवश्यक आहे. रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड यांसारख्या खेळाडूंची भारतीय संघात निवड होत नाही, तेव्हा असे वाटते की संघात निवड होण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्रीशी संबंध, एक चांगला मीडिया मॅनेजर आणि शरीरावर टॅटू आवश्यक आहेत.