| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
आज आपल्या देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनासुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. आणि इथे बसलेल्या माझ्या सर्वसामान्य आणि कष्टकरी शेतकर्यांनासुद्धा एकच मत आहे. या मताची किंमत तुम्हाला कळली पाहिजे. हे एक मत या देशाचं भविष्य ठरवणार आहे. तुम्हा सर्वांच्या एक-एक मताने अनंत गीते रायगडचा खासदार होणार आहे. अनंत गीतेंसारख्या खासदारांच्या एक-एक मताने देशाचा पंतप्रधान आणि या देशाचं सरकार निवडलं जाणार आहे. एवढं महत्त्वाचं तुमचं मत आहे. त्यामुळे या निवडणुकीने भ्रष्टाचाराला रायगडमधून हद्दपार करण्याची आपण शपथ घेऊया, असं आवाहन रायगड लोकसभा मतदारासंघाचे उमेदवार अनंत गीते यांनी केलं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत श्रीवर्धनमधील रानवली येथे मंगळवार, (दि.2) एप्रिल झालेल्या जाहीर मेळाव्यात अनंत गीते यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. याप्रसंगी शिवसेना आणि इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या देशात लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही हे ठरवणारी ही निवडणूक आहे.आज दुर्दैवाने लोकशाही संकटात असून, हुकूमशाही चोरपावलांनी येते की काय? म्हणून या हुकूमशाहीला रोखण्याकरिता आणि लोकशाहीला वाचवण्याकरिता जे जे राष्ट्रभक्त आहेत, ज्याचं या देशावर प्रेम आहे, ते सगळे इंडिया आघाडीच्या रूपाने एकत्र आले आहेत .या एकत्र आलेल्या विविध पक्षांच्या माध्यमातून आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे गीत म्हणाले. रायगडचा विचार केला तर ही निवडणूक भ्रष्टाचार विरोधात सदाचाराची आहे. 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरेंची रायगडच्या राजकारणातून हद्दपारी वाचली ती शेकापच्या जयंत पाटील यांच्यामुळे. ही हद्दपारी वाचवण्याचं काम ज्यांनी केलं होतं त्या जयंत पाटलांच्या पाठीतच त्यांनी खंजीर खुपसला. ज्यांनी त्यांना राजकीय जन्म दिला, त्या बॅरिस्टर अंतुले आणि त्यानंतर ज्यांनी त्यांना मोठं केलं त्या शरद पवारांच्या पाठीतही त्यांनी खंजीर खुपसला. राजकीय जन्म देणार्या अंतुलेंचा जो झाला नाही, ज्या शरद पवारांनी त्यांना मोठं केलं त्या शरद पवारांचा जो झाला नाही, तो तुमचा काय होईल? अशा विश्वासघातकी माणसाला तुम्ही या निवडणुकीत मतदान करणार आहात का? असा सवाल अनंत गीते यांनी उपस्थितांना केला.
तटकरेंचा हिशोब चुकता करेन इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा जनसंवाद दौर्याचा दुसरा दिवसदेखील विरोधकांवर तोफ डागत सुरु झाला. त्यावेळी गीतेंनी सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील खामगाव येथे या निवडणुकीत पराभूत करून तटकरेंचा हिशोब चक्रीवाढ व्याजासह चुकता करेन, तसेच देवेंद्र फडणवीस यांची राजकीय भूकदेखील थांबवू, असा इशारा दिला. देशात लोकशाही वाचविण्याकरिता राज्यातील लोकसभा निवडणूक ही राजकारणाला कलाटणी देणारी असेल, राज्याची अवस्था आज बिहारप्रमाणे असून, सत्ता मिळवण्याकरिता भाजप नीच पातळी ओलांडत आहे, भाजपला बहुमत मिळवूनदेखील राज्यात भाजप फोडाफोडीचे राजकारण करतंय, त्यामुळे त्यांना हद्दपार करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरलो आहोत, अशी भावना गीतेंनी यावेळी व्यक्त केली.