प्लास्टिक प्रदुषणाचा खाड्यांना विळखा

जैवविविधतेचा समतोल ढासळतोय; खारफुटीची लागवड करणे गरजेचे


| रायगड | प्रतिनिधी |

कोकणातील खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, थर्माकोल, मिनरल वॉटर व कोल्ड्रिंक्सच्या असंख्य बाटल्यांमुळे प्रदुषणाचा धोका वाढत आहे यामुळे मासे, जलचर, पक्षी आणि खेकडे, येथील खारफुटी जंगल अशा सर्व जैवविविधतेचा समतोल ढासळण्याची भीती आहे. याबाबत जनजागृतीची गरज आहे. प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे, पुनर्वापर करणे हाच पर्याय समोर आला आहे तसेच खारफुटीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.

कोकणात म्हणजेच पालघर , ठाणे , रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असणाऱ्या प्रमुख खाड्यांमध्ये होडीने प्रवास करताना असंख्य प्रकारच्या प्लास्टिकचा भस्मासूर पाहायला मिळत आहे. समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही. त्यामुळे भरतीच्या वेळेस असंख्य प्रकारचा कचरा हा चढत्या पाण्यासोबत खाडीतून पुढे सरकत राहत असतो. कोकणातील खाड्यांचा विचार करता आसपास अनेक गावे आहेत. केरळपेक्षा अतिशय सुरेख बॅकवॉटर टुरिझम (खाडी पर्यटन) येथे विकसित होऊ शकते. पर्यटकांना नेहमीच साद घालणाऱ्या या खाड्या प्लास्टिक व कचरा, गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे या खाड्यांतील गाळ काढणे, प्लास्टिकमुक्त नदीप्रमाणे प्लास्टिकमुक्त खाडी असे अभियान राबवले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

प्लास्टिक प्रदूषण असल्याचा एक अहवाल गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने 2020 मध्ये प्रसिद्ध केला होता. दररोजचे वारे, ऋतू, समुद्रप्रवाह, किनाऱ्याचा दंतूरपणा, पर्यटन आणि शहरी वस्त्यांची नजीकता यावर प्लास्टिकचे प्रदूषण अवलंबून असते, असे अहवालात म्हटले होते. तसेच जिथे पर्यटकांचे जाणे-येणे वारंवार सुरू आहे अशा सर्व ठिकाणच्या किनाऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण आहे. अशा अनेक ठिकाणी किनाऱ्यावरच्या नदीनाल्यांतून येणारे प्लास्टिक खाडीत येऊन पडते आणि तिथून ते समुद्रात जाते. भरती येते तेव्हा हे सगळे प्लास्टिक किनाऱ्यावरच्या पुळण प्रदेशांत पसरते. प्लास्टिकचे कण पुळणीवरच्या वाळूत मिसळून जातात आणि त्यांचे विघटन खूप कमी वेगाने होत असल्यामुळे पुळणींवरच अडकून राहतात, असे निरीक्षण अहवालात नोंदवले होते.

Exit mobile version