सावित्री, पाताळगंगा नद्यानी ओलांडली धोक्याची पातळी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे सावित्री आणि पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. कुंडलिका आणि अंबा या दोन्ही नद्याही इशारापातळीच्या वर वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटात दरड कोसळली असल्याने पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानची वाहतुक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर आणि पोलादपूर खोऱ्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आला आहे. नदीने धोका पातळी ओलांडली असून ती सकाळी सात वाजता 6.50 मीटरवर वाहत आहे. त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत खालापूर परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोका पातळी ओलांडली आहे. ही मौजे लोहप येथे 21.52 मीटरवर वाहत आहे. नदीचे पाणी सखलभागात शिरण्यास सुरुवात झाल्याने आपटा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कुंडलिका आणि अंबा नद्याही इशारा पातळ्यांवर वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास या नद्याही धोका पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहा आणि नागोछणे शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण तालुक्यातील चिरनेर येथे पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक घरांमध्ये मध्यरात्री पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अलिबाग तालुक्यातील मिळकतखार मळा येथील नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने या पूरस्थिती निर्माण झाली आहे. नेरळ कळंब रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय.संततधार पावसामुळे आंबेनळी घाटात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दरड कोसळली.
त्यामुळे पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. सकाळी दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाने आज आणि उद्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.