। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेली दोन वर्षे शासनाकडे तगादा लावला आहे. मात्र शासनाकडून सारातमक प्रतिसाद मिळत नसल्याने 5 जुलै रोजी कर्जत तालुका रास्त धान्य दुकानदार संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य रास्त धान्य दुकानदार संघटना यांच्या माध्यमातून रास्त धान्य दुकानदार यांच्या समस्या आणि प्रश्नाबाबत गेली दोन वर्षे पाठपुरावा सुरु आहे. मात्र शासनाकडून त्या प्रश्नांवर आणि समस्या सोडविण्याबाबत ठोस कार्यक्रम जाहीर केला जात नाही. त्यामुळे तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार संघटना यांच्यावतीने तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे प्रल्हाद कार्ले, रत्नाकर बडेकर, सतीश हडप, वनिता म्हसे, कमल विशे, नंदा डामसे, रईस खान,संतोष गायकर, राजेंद्र लाड, तुकाराम खंडागळे, वासुदेव बडेकर, आदींसह तालुक्यातील रेशन दुकानदार उपस्थित होते.