गोपाळ तंतरपाळे यांची लोकसभेतून माघार
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभेचे नेतृत्व करण्यास इंडिया आघाडीचे शिवसेनेचे अनंत गीते हेच एकमेव सक्षम उमेदवार आहेत. सर्व भीमशक्ती त्यांच्या पाठीशी उभी करणार आहे. त्यामुळे विजय हा अनंत गीते यांचाच होणार, असा विश्वास भीमशक्ती महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. गोपाळ तंतरपाळे यांनी रायगड लोकसभेसाठी दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. इंडिया आघाडीचे सर्व नेते विशेष करुन शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिवसेनेचे स्थानिक नेते रुपेश जामकर, पेण येथील सबलीकरणाचे नेते उमेश लांगी, पिंपरी शहरचे संजय ताठे यांनीदेखील मला विनंती केली होती. राज्यभरात एसी, एसटी समाजाच्या सबलीकरणासाठी आमचे नेते भीमशक्ती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्राकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात काम करत आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकारने सबलीकरणाचे प्रश्न सोडवले नाहीत. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेलो होतो. मात्र, त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी आमचा प्रश्न सोडवावा यासाठी त्यांना पाठिंबा देत असल्याचे तंतरपाळे यांनी स्पष्ट केले.
इंडिया आघाडीच्या 48 उमेदवारांच्या विजयासाठी राज्यभरातील आमचे नेटवर्क वापरुन महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करु, तसचे रायगड लोकसभेत गीते यांना तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी करु, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. गीतेंसारख्या स्वच्छ चारित्र्य आणि निष्कलंक उमेदवारांचा पराभव करणे तटकरे यांना कठीण आहे. देशात इंडिया आघाडीचेच सरकार येणार असून, आगामी विधानसभेच्या निवडणुकीतदेखील आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. जयंत पाटील यांचे आभार शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी एस, एसटी समाजाच्या सबलीकरण योजनेबाबत नागपूर अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. त्याबद्दल आमदार जयंत पाटील यांचे सर्व समाजाच्यावतीने आभार व्यक्त करतो. नजीकच्या कालावधीत सरकार स्थापन झाल्यावर हा प्रश्न निश्चितच मार्गी लागणार आहे.