दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड रेल्वे पुलाखाली असणाऱ्या गोदी नदीवरील पुलावर अनेक दिवसांपासून मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे मंगळवारी एक दुचाकीस्वार या खड्ड्यात अडकून पडला. सुदैवाने पाठीमागून कोणतीही गाडी न आल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, या खड्ड्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण?, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील मुंबईकडून कोलाडकडे जाणाऱ्या कोलाड गोदी नदीवरील पुलावर अनेक जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. जुना असलेल्या या पुलाचे काम अद्याप केलेले नाही. या पुलाच्या बाजूला असणारे पुलाचे काठडे कोसळले होते. ते नवीन बांधण्यात आले आहेत. परंतु, जुना असलेला पूल तसाच आहे. मग हा पूल कठड्यामुळे नवीन झाला असल्याचे दाखविण्यात आला नाही ना?, असा सवाल प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
कोलाड परिसरात शाळा, कॉलेज, तसेच पॉलिटेक्निकल कॉलेज असून या महामार्गावरून विद्यार्थी, असंख्य गावातील नागरिक तसेच धाटाव एम.आय.डी.सीकडे कामावर जाणारे कामगार याच मार्गावरून जातात. तर मुंबईकडून गोवाबाजूकडे जाणारी असंख्य वाहने याच मार्गावरून जात आहेत.
दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या खड्ड्यातील पाणी आटले आहे. यामुळे हा खड्डा दिसत आहे. परंतु, पाऊस पडल्यानंतर हा खड्डा पाण्याने भरला जातो व हा भला मोठा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. यामुळे या खड्ड्यामुळे मोठा अपघात घडण्याआधी संबंधित ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम खाते यांनी लक्ष देऊन या पुलावरील खड्डे त्वरित भरावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
महामार्गाचे काम अपूर्ण
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली सतरा-अठरा वर्षांपासून सुरु आहे. परंतु लोकनेत्याकडून फक्त तारीख पे तारीख देण्यात आल्या. सर्व डेडलाईनही फेल गेल्या असल्याच्या दिसून आल्या आहेत. आता काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहेत. मात्र, आंबेवाडी (कोलाड) येथील बाजारपेठेत महामार्गाचे अपूर्ण स्थितीत आहे. या बाजारपेठेत असणारा उड्डाणपुल अर्धवट स्थितीत आहे. तर या बाजारपेठेत रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होत आहेत. तर अपघाताचा धोका ही वाढला असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन या बाजारपेठेतील काम मार्गी लावावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







