पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातून वाहणार्या उल्हास नदीवरील वाकस पुलाच्या तळाशी वाहत्या पाण्याच्या बाजूला जैवकचरा टाकला जात असल्याचे आढळून येत आहे. रात्रीच्या वेळी हा कचरा टाकण्यात येत असल्याचे बोलले जाते. रुग्णालय किंवा मेडिकल दुकाने यांच्याकडून हा जैव कचरा टाकला जात असल्याने पर्यावरणप्रेमींसह स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नदीच्या वाहत्या पाण्याच्या बाजूला हा कचरा टाकण्यात येत असल्याने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जैवकचरा ही मोठी समस्या असून, कर्जत तालुक्यातील रुग्णालयांनी आपला जैवकचरा गोळा करून ठेवायचा असतो आणि नंतर तो पनवेल येथे पाठवून द्यावा, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, कर्जत तालुक्यात जंगल भागात अनेक ठिकाणी जैवकचरा हा निर्मनुष्य ठिकाणी टाकण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यात आता नेरळ-कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर वाकस पूल येथे जैवकचरा सातत्याने टाकला जात आहे. त्या ठिकाणावरून वाहणारी उल्हास नदी ही कर्जत तालुका आणि ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाते. असे असताना नदीच्या पाण्यालगत हा कचरा टाकण्यात येत असल्याने नदीच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यावर तो पाण्यातदेखील जाऊ शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मॉर्निंग वॉकसाठी कशेळे रस्त्यावर जाणारे नेरळ येथील काही पर्यावरणप्रेमी यांच्याकडून नाराजी व्यक्त केली आहे.
नेरळ परिसरातील रुग्णालये किंवा मेडिकल दुकानांकडून हा जैवकचरा टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. संबंधित प्रशासनाकडून हा जैवकचरा टाकणार्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. जैवकचरा ही मोठी समस्या बनली असून, प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार तो आरोग्य यंत्रणेने पनवेल येथे पाठवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. उल्हास नदीमधील पाणी पिण्याचे असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने नदीच्या परिसरात जैवकचरा टाकू नये, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींसह स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.