खर्गे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. वीर सावरकर हे देशाची व रत्नागिरीकरांची अस्मिता आहेत. त्यामुळे वीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आ.बाळ माने यांनी जोडे मारो आंदोलनाप्रसंगी केले.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, प्रियांक खर्गे मुर्दाबाद, अशा घोषणा देत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शुक्रवारी (दि.8) निषेध आंदोलन करण्यात आले. बाळ माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, देशभरात, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कोणत्याही स्थितीत सहन करणार नाही. यावेळी काँग्रेसविरोधी घोषणा देण्यात आल्या. खर्गे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. खर्गे यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली.
भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ॠषिकेश केळकर यांच्या नेतृत्वात आंदोलनाला युवा मोर्चा प्रदेश चिटणीस विक्रम जैन, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर, राजापूर (पश्चिम) महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुयोगा जठार, मनोज पाटणकर, प्रमोदशेठ खेडेकर, संदीप (बाबू) सुर्वे, बापू गवाणकर, राजू महाकाळ, युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धाय मयेकर, निरंजन जठार, सोहम खानविलकर व पमू पाटील, अतिफ काझी, शिवानी दुदम, चिन्मय शेट्ये, गौरव जाधव आदींसह भाजपा कार्यकर्ते यांनी निषेध नोंदवला.







