| रसायनी | वार्ताहर|
देशात महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे आहेत, त्यावर भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही. मात्र, नको ते कारण दाखवून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप रसायनी येथील काँग्रेसचे खालापूर तालुकाध्यक्ष कृष्णा पारंगे यांनी केला आहे.
आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या हुकुमशाही, स्वार्थी वृत्तीचा जाहीर निषेध करतो. भाजपतर्फे लोकशाहीचा खून होत असून, आम्ही काँग्रेस नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, असे परखड मत पत्रकार परिषदेत कृष्ण पारंगे यांनी व्यक्त केले.
उद्योगपती अदाणी समुहातील शेल कंपन्यांची वीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीबाबत कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरल्यामुळे मोदी सरकारने राहुल गांधींवर निलंबनाची कारवाई केली ती लोकशाही विरोधातील असून, याचा देशभरातील काँग्रेस पक्ष निषेध करीत असल्याचे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद राईलकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल डवळे यांनी बोलताना सांगितले.