व्यापार्‍यांना दोन्ही मात्रांचे लसीकरण अनिवार्य

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
आटोक्यात आलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवांत झालेली यंत्रणा ओमिक्रॉमुळे पुन्हा एकदा कार्यतत्पर झाली आहे. कोरोनोच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग जिल्ह्यात होऊ नये यासाठी आगामी काळापासून आठवडा बाजारात येणार्‍या प्रत्येक व्यापार्‍याला दोन डोस सक्तीचे केले आहेत.
डोस न घेतलेल्या व्यापार्‍याचा मालमत्ता विभागाकडून माल जप्त करून संबंधित व्यापार्‍याला शहराच्या सीमेबाहेर सोडण्याचा आदेश नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिला आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे पालिकेने शनिवार आणि मंगळवार आठवडा बाजार दोन आठवडे झाले सुरू केला आहे. पुन्हा नव्या व्हेरिएन्टची बाधा होऊ नये, यासाठी पालिकेने खबरदारी म्हणून कडक पावले उचलली आहेत. परजिल्ह्यातून येणार्‍या व्यापार्‍यांचे दोन डोस पूर्ण असणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी पुढच्या शनिवारपासून मालमत्ता विभागाकडून व्यापार्‍यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांना बाजारात बसण्याची परवानगी दिली जाईल.
ओमियोक्रॉन बाधितापासून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढताना दिसत आहे. राज्यात त्याचा प्रवेश झाला असून अनेक ठिकाणी ओमियोक्रॉनचे बाधित सापडले आहेत. त्यापैकी कोणाचा मृत्यू झाल्याची नोंद नसली तरी एक व्यक्ती 50 ते 60 वर लोकांना बाधित करू शकतो, एवढ्या वेगाने पसरणारा हा विषाणू आहे.
कोरोना आटोक्यात आल्यामुळे नागरिक बिनधास्त होते. अनेकांनी लसीकरणाकडेही दुर्लक्ष केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालत स्पष्ट झाले आहे. मात्र आता या लोकांची धास्ती वाढली आहे.पालिकेमार्फत ऑफलाईन लसीकरण कित्येक महिने सुरू आहे. मात्र गेली दीड ते दोन महिने या केंद्राला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
नियुक्त कर्मचार्‍यांना लस घेण्यासाठी येणार्‍यांची प्रतीक्षा करावी लागते. नगरसेवक आपापल्या प्रभागातील नागरिकांना लसीसाठी बोलवून घेत होते. अपेक्षित प्रतिसाद नसल्याने मधल्या काळात काही दिवस केंद्र बंद ठेवले होते. मात्र ओमियोक्रॉनच्या नव्या व्हेरिएन्टमुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यास टाळाटाळ करणारे आता पुन्हा लसीकरणासाठी पालिकेच्या केंद्रावर गर्दी करत आहेत.

Exit mobile version