निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी यंत्रणेला जुंपले कामाला
। रायगड । खास प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विविधता आहे. ही संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यशासनाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्यातदेखील हा महोत्सव पाच दिवस साजरा केला जात आहे. राज्याची संस्कृती घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अक्षरशः कामाला जुंपले आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. केलेल्या आणि करणाऱ्या कामांची टिमकी वाजवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रचारासाठी सरकारी यंत्रणेला हाताशी धरले आहे. काहीच दिवसांपूर्वी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळीदेखील सत्ताधाऱ्यांनी आपली ब्रॅण्डिंग करुन घेतले होते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये आघाडीवर आहे.
प्रचार, प्रसार करण्यासाठी फुकटची सरकारी यंत्रणा, सरकारची तिजोरी वापरता येते. त्याचा पुरेपूर वापर करण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येते. निवडणुका जवळ आल्याने असे कार्यक्रम एकामागून एक सुरु आहेत. 12 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत. त्यामध्ये व्यावसायिक कलाकारांबरोबरच स्थानिक कलाकारांनादेखील संधी दिली जात आहे. माणगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी सहा कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली होती. आतादेखील कोट्यवधी रुपयांचा चुराडा होणार आहे. महासंस्कृतीच्या नावावर सत्ताधारी हे आपले ब्रॅण्डिंग करत आहेत. सरकार आणि प्रशासनाला जनतेच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पूर्वनियोजितपणे करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सर्व कार्यक्रमाची तयारी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होत आहे. कार्यक्रमासाठी यंत्रणा अडकून पडत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. वेळेवर कामे होत नसल्याने नागरिकांना फुकटचा हेलपाटा होत आहे. तसेच, त्यांना आर्थिक भुर्दंडही बसत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारचे आदेश असल्याने आम्हाला काम करावे लागत आहे. सगळं काय आणि कशासाठी सुरु आहे, हे आम्हालादेखील माहिती आहे. मात्र, आम्ही उघडपणे बोलू शकत नाही, अशी दबक्या आवाजात विविध सरकारी कार्यालयांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.
महासंस्कृती महोत्सवासाठी दोन कोटी रुपयांचा निधी सरकारने देऊ केला आहे, तर अन्य निधी सीएसआर फंडातून असा एकूण चार कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. प्रसिद्ध कलाकारांना घेऊन महासंस्कृती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तरीदेखील या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी 10 हजार खुर्च्या आहेत. पैकी आठ हजारांहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहात असल्याने कलाकारांनादेखील कला सादर करताना उत्साह येत नसल्याचे गायक संगीतकार अवधुत गुप्ते यांनी बोलून दाखवले. प्रशासन निवडणुकीच्या मोडमध्ये आहे, तर प्रेक्षक हे आपल्या पाल्यांच्या परीक्षांच्या चिंतेत आहेत. त्यामुळे कार्यक्रम बहारदार असले, तरी सरकारचे टायमिंग चुकल्याने ब्रँडिंंगचा खर्च वाया गेल्याचे बोलले जाते.