ब्रेकिंग: अग्निपथ योजनेमुळे तरुणाची आत्महत्या

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय सैन्यात भरती होण्याची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने लेखी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केली आहे. ओडिशामध्ये ही घटना घडली असून या विद्यार्थ्याच्या पालकांनी केंद्र सरकारच्या योजनेला यासाठी जबाबदार धरलं आहे. या योजनेविरोधात देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. बालासोरे जिल्ह्यातल्या तेन्तेई या गावातल्या या तरुणाचं नाव धनंजय मोहन्ती असल्याची माहिती मिळत आहे. तो भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. मात्र आर्मीची परीक्षा रद्द झाल्यानंतर या तरुणाने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं की, अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर भारतीय सैन्याने लेखी परीक्षा रद्द केली. यामुळे त्याने स्वतःला गळफास लावून घेतला आहे.


धनंजयच्या मित्राने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, तो माझा जवळचा मित्र होता. तो गेल्या ४ वर्षांपासून सैन्यभरतीची तयारी करत होता. त्याने दीड वर्षांपूर्वी शारिरीक क्षमतेची चाचणीसुद्धा पार केली होती. मात्र लेखी परीक्षा कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलली जात होती. शेवटी अग्निपथ योजनेमुळे ही परीक्षा रद्द झाली. आम्ही वयोमर्यादाही ओलांडली आहे.
धनंजयचा मित्र पुढे म्हणाला की, व्हॉटसपच्या माध्यमातून त्याला कळलं की, उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकत्त्यामधल्या अनेक तरुणांनी आत्महत्या केली. हे सगळं पाहून त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आणि काल रात्री त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने आम्हाला मेसेज पाठवला की सरकारवर विश्वास ठेवू नका आणि कधीही त्यांना मतदान करु नका.

Exit mobile version