। रत्नपूर । प्रतिनिधी ।
कन्नड तालुक्यातील पिशोर येथून लग्न लावून येणार्या नववधूचे रत्नपूर तालुक्यातील इंदापूर चौफुलीवर वाहन आडवे लावून अपहरण करण्याचा सिनेस्टाईल प्रयत्न नातेवाईक व गावकर्यांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. इतर चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
तालुक्यातील बाजार सावंगी येथील एका तरुणाचे लग्न कन्नड तालुक्यातील पिशोर येथील येथील मुलीसोबत ठरले होते. शुक्रवारी लग्न समारंभ आटोपल्यानंतर सायंकाळी नववधूला घेऊन बाजार सावंगी कडे येत असताना इंदापूर चौफुली येथे पांढर्या रंगाच्या क्रेटा गाडीने त्यांचा रस्ता अडवला. त्या गाडीतील सहा जण नववधूला जबरदस्तीने गाडी बाहेर ओढू लागले. या प्रकारामुळे गाडीतील सर्वांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे चौफुलीवर धाव घेतली. दरम्यान, काहींनी प्रसंगावधान राखत याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच अपहरणकर्त्यांनी आपल्या वाहनातून पळ काढला. पळ काढताना अपहरणकर्त्यांच्या वाहनाने रस्त्यावरील तीन जणांना उडवले. त्यामध्ये गाडीचे नुकसान होऊन गाडी बंद पडली आणि त्यांनी पळ काढला. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यातील दोघांना पकडले. याप्रकरणी राहुल नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाश मते, ज्ञानेश्वर मते, एजाज अय्युब शहा, कासीफ असीफ खान, रोहित बाळू भालेराव, विनोद कसारे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एजाज आयुब शहा व कासिफ असिफ खान यांना पोलिसांनी अटक केली असून, यातील अन्य चौघा आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.