टायर फुटल्याने बस पलटी,पाच जण जखमी

। रसायनी । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी (दि.5) पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी बस टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या मिडल गार्डनमध्ये पलटी झाली. या अपघातामध्ये बसमधील पाच जण जखमी झाले आहेत.

खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ हा अपघात झाला. कवठेमहाकाळ येथून मुंबईला 52 प्रवासी घेऊन ही बस निघाली होती. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही बस आली असता तिचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती रस्त्याच्या मिडल गार्डनमध्ये पलटी झाली.

जखमी प्रवाशांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अश्‍विन पवार, नैतिक पवार (दोघेही राहणार जोगेश्‍वरी), अरुष एकनाथ हाके (मानखुर्द), नंदा लक्ष्मण नलवडे (दहिसर), ज्योती कांबळे (भाईंदर) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या घटनेचा अधिक तपास खालापूर पोलीस करत आहेत.

Exit mobile version