अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील एकूण 182 ग्रामपंचायतींमधील 285 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पद्धतीने राबविण्यात येणारा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा सोमवार, दिनांक 22 नोव्हेंबर 2021 असून तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस सोमवार, दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द केली आहे.
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ-अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) मंगळवार, दि.30 नोव्हेंबर ते सोमवार, 6 डिसेंबर 2021 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. (सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारली जाणार नाहीत).
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ-अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) मंगळवार, दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत राहील.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ-अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी गुरुवार, दि.9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ गुरुवार, दि.9 डिसेंबर 2021 रोजी, दुपारी 3 वाजेनंतर राहील.
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत राहील तर मतमोजणी बुधवार, 22 डिसेंबर 2021 रोजी होईल. (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील).
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक सोमवार, दि.27 डिसेंबर 2021 पर्यंत राहील.
सन 2020 चा महाराष्ट्र् अधिनियम क्रमांक 4, दिनांक 11 मार्च 2021 अन्वये जात वैधताप्रमाणपत्र सादर करण्याची हमी देण्याचा मुभा कालावधी संपुष्टात आल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सन 1959 चा अधिनियम क्र. 3 च्या कलम 10-अ मधील तरतुदीनुसार नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमापत्र सादर करणे आवश्यक आहे.
या पोटनिवडणुकांसाठी राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. (जात पडताळणी समितीस प्रस्ताव सादर केल्याची पावती ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी केले आहे.