अलिबाग | प्रतिनिधी |
राज्याचे हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि.01) कृषी दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर वृक्ष लागवड करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने एक जूलैला दरवर्षी कृषी दिन साजरा केला जातो. वेगवेगळे उपक्रम राबवून शेतीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न कृषी विभागामार्फत केला जातो. यावर्षी निवडणूकीमुळे कृषी दिन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. अलिबागमधील कुंटेबागमधील जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी नारळासह सुपारींच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी राहूल कदम, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाम कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल देवांग, कृषी अधिकारी मिलींद चौधरी, राजेश घरत, कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या वतीने देखील कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी गावे, वाड्यांमधील परिसरात ठिकठिकाणी रोपांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले. तसेच कृषी विभागामार्फत या निमित्ताने भाजांची बियांचे किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला.