| चिपळूण | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा योजनेतून चिपळूण तालुक्यातील कळंबट ग्रामदेवता देवरहाटी परिसरात 3,99,968 रूपये खर्च करून स्मशानशेड उभारण्याचे काम जानेवारी 2025 मध्ये सुरू झाले. प्रारंभी ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या; मात्र आज सात महिने उलटूनही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदाराला कामाच्या एक तृतीयांशहून अधिक रक्कम आगाऊ अदा करण्यात आली आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाला आणि अपूर्ण स्मशानशेडचे वास्तव समोर आले आहे.
स्मशानशेडच्या शेजारील मोकळ्या जागेत चिखल, गटारे आणि पावसात अंत्यविधी करावे लागत आहे. ही स्थिती गावकऱ्यांना मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यथित करणारी आहे. उभ्या स्मशानशेडच्या शेजारीच ही दुर्दशा घडते आहे. स्मशानशेड ही केवळ भौतिक सुविधा नसून मरणोत्तर सन्मानाची बाब असते. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही गरजही अपूर्ण राहिली आहे. अशा संवेदनशील कामात प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारीची टाळाटाळ ग्रामीण भागातील विकास नावाच्या संकल्पनेचा कटू वास्तव प्रतिबिंबित होते.
या रखडलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी ठरवावी, कामाचा दर्जा तपासून ते त्वरित पूर्ण करून स्मशानशेड ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करावे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






