। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. यादरम्यान बुधवारी राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारला जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या असे अवाहन केलं आहे.ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत,अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यघटनेने एससी, एसटी सुविधा दिल्या अधिकार दिले आहेत. समाजात हा मोठा वर्ग ओबीसी आहे. त्यांना आधार द्यायची गरज आहे. तो सन्मानाने उभा राहत नाही तो पर्यंत गरज आहे, समाजाच्या उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण दिलं पाहीले असे पवार म्हणाले. केंद्राने ओबीसी जनगणना करावी म्हणजे त्यानुसार न्याय वाटणी व्हावी, कोणी इथे फुकट मागत नाही. जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्याच्या हातात देशाची सूत्र आहेत ते करतील असे वाटत नाही, आपल्याला एकत्र याव लागेल, असे शरद पवार म्हणाले. रस्त्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्यांच्या हातात राज्य त्यांची मानसिकता वेगळी असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
सत्य समोर आल तर चुकीचं वातावरण होईल? वस्तुस्थिती समोर आली तर अस्वस्थता येईल?कोर्टाने जे माहिती मागितली त्याबद्दल डेटा गोळा करायचे काम सुरू आहे. आज भाजप नेते सांगतात, माजी मुख्यमंत्री सांगतात धोका दिला, पाच वर्ष सत्ता असताना, देशात सरकार असताना तुम्ही झोपला होता का? असा सवाल देखील शरद पवार यांनी भाजपला विचारला.
मला आनंद आहे की या परिषदेत सर्वांनी केंद्र सरकारने ओबीसींची जातीय जनगणना करावी असा ठराव मान्य केला. एकदा करून टाकुयात, एकदा कळू द्या देशाला की नक्की ओबीसींची संख्या काय आहे. ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करावी.
– शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याची जोशी यांनी एका ठिकाणी बोलताना जातीनिहाय जनगणना मला अजिबात मान्य नाही असं सांगितलंय. का नको तर यांचं कारण सांगताना त्यांनी समाजातील एकीवर प्रहार होईल असं कारण सांगितलं, चुकीचं वातावरण निर्माण होईल. सत्य समोर आलं तर चुकीचं वातावरण निर्माण होतं का? सत्य समोर आलं, ओबीसी नेमके किती आहेत, त्याची अवस्था काय आहे याची वस्तुस्थिती संबंध देशासमोर आली तर त्याने देशात अस्वस्थता निर्माण होईल का? असा सवाल शरद पवार यांनी विचारला.