। मुंबई । प्रतिनिधी ।
एकीकडे राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे मात्र राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर, दुसरीकडं तापमानात देखील दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाच्या तापमानात अधिक वाढ होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत. द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झालं आहे.