| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवर चांदई गावाजवळ नव्याने पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून वाहतूक देखील सुरु झाली, असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्याची कामे अपूर्ण असताना पुलावरून वाहतूक सुरु केल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पुलावरून चिंचवलीकडून चांदईकडे जाताना रात्रीच्या वेळी वाहने वेगात असल्यास थेट उल्हास नदीमध्ये जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार कोटी खर्चून उल्हास नदीवर पूल बांधण्यात आला आहे. चांदई येथे 2000 साली पूल बांधण्यात आला होता, आणि तो पूल एकच वाहन जात असल्याने दुसर्या वाहनाला थांबावे लागायचे, त्यामुळे सातत्याने दुसरा पूल उभारण्याची मागणी होत होती. उल्हासनदीवर चांदई येथे पूल बांधण्याचे काम मंजूर झाले. त्या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन मार्च 2024 मध्ये या पुलावरून वाहतूक देखील सुरु झाली. या पुलावरील एकेरी वाहतूक सुरू असून चिंचवली भागाकडून जात असताना वाहनांना धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली आहे. कोणत्याही पुलाचे बांधकाम केले जात असताना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे उभारले जातात. मात्र, चांदई येथील पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे संरक्षण कठडे बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहने वेगाने आल्यास ती वाहने थेट नदीत जाऊ शकतात. उल्हास नदीवरील या पुलावर निर्माण करण्यात आलेल्या मृत्यूच्या सापळा बद्दल स्थानिक ग्रामस्थ आणि माजी सरपंच संतोष कोळंबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकार्यांना ही बाब सांगितली आहे.