अदिती तटकरे पालघरमध्ये
| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पालकमंत्री कोण हे सरकारने जाहीर केलेले नाही. त्यातच तीन पक्षाचे सरकार असल्याने कोणी कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करायचे हा वाद सुरु होता. त्यामुळे सरकारलरा सदरची यादी दोन वेळा बदलावी लागली आहे. आता नव्या यादीनुसार पुण्यात राज्यपाल रमेश बैस, कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगडात मंत्री चंद्रकांत पाटील हे ध्वजारोहण करणार आहेत. रायगडच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर पालघर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करणार आहेत.
मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी आपल्या देशाचा 76 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात. पण पालकमंत्र्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार आहे. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सामील झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री तर अन्य नऊजण मंत्री झाले. परंतु वादामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप रखडले आहे. आता याच वादाचा फटका ध्वजारोहण समारंभाला बसला आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी सरकारला पुन्हा बदलावी लागली आहे.
राज्य सरकारने पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु हा जिल्हा भाजपला पाहिजे आहे. तोच वाद रायगडसाठी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आ. भरत गोगावले सातत्याने आपला दावा सांगत आहेत. त्यामुळे 15 ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची यादी तयार केली गेली. त्यात रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी दुसऱ्यांदा यादी बदलण्यात आली आहे. आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहे, तर अजित पवार हे कोल्हापूरमध्ये ध्वजारोहण करतील. त्यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील ना अजित पवार असा तोडगा काढला गेल्याचे बोलले जाते.