‘शासन आपल्या दारी’च्या अनुषंगाने वाहतुकीत बदल

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने जनसमुदाय, कार्यकर्ते येणार असून सुमारे 2 हजार बसेस व इतर लहान मोठी वाहने घेवून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून उपाय योजना म्हणून दि.05 जानेवारी रोजी 1.00 वाजल्यापासून रात्रौ 11.00 वाजेपर्यतच्या कालावधीत दूध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व जड-अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्ग क्र.66 या महामार्गावरुन गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या कशेडी ता.पोलादपूर ते खारपाडा ता.पेण पर्यंत व मुंबई बाजूकडून येणाऱ्या खारपाडा ता.पेण ते कशेडी ता.पोलादपूरकडे जाणाऱ्या वाहनांना त्याचप्रमाणे खोपोली-पालीफाटा ते वाकण महामार्ग क्रमांक 584(अ) या महामार्गावरुन गोवा बाजूकडे जाणाऱ्या व मुंबई बाजूकडे येणाऱ्या अशा जड अवजड वाहनांकरीता वाहतूक बंद करणेबाबत, तसेच दि.05 रोजी सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत व दुपारी 3.00 ते रात्रौ 10.00 या कालावधीत गोवामार्गे येवून मुंबईकडे जाणारी वाहने ही मोर्बेमार्गे माणगाव अशी वळविण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जारी केला आहे.

Exit mobile version