स्वराज्य संघटनेची स्थापना
। पुणे । प्रतिनिधी ।
मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामं करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असं छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर केलं. मी आजपर्यंत समाजासाठी केलेली कामे पाहून माझ्या मागे आपण उभे राहायला पाहिजे. मला राज्य सभेत पाठवायला पाहिजे, असं आवाहन देखील संभाजीराजेंनी अपक्ष आमदारांना केलं आहे. मी आजपासून कुठल्या ही पक्षात नाही. सगळ्यांना संघटित करण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी आहे. आम्ही सर्व एक संघटना स्थापित करणार आहोत. त्याचं नाव स्वराज्य आहे, असंही संभाजी राजेंनी सांगितलं. ही संघटना राजकीय पक्ष झाला तरी त्याला हरकत नसावी. हा पहिला टप्पा आहे, असं म्हणत त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्याचे संकेत दिले.