तारीख ठरली, पण नवी मुंबई विमानतळाचे नामांतर कधी?

विमानतळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; दिबांचे नाव देण्यावर भाष्य नाही

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाहणीसाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह थेट भेट दिली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हा दौरा झाला, फोटो काढले गेले, चर्चा झाली; पण, जनतेला अपेक्षित असलेली नामकरणाची घोषणा करण्यात आलेली नाही. विमानतळाचे उद्घाटन कधी करायचे तेव्हा करा, पण आधी विमानतळाला दि.बांच्या नावाची घोषणा करा, अशी मागणी दि.बा. पाटील संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद ‌‘बॅग क्लेम सिस्टीम‌’ विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पाहणीदरम्यान संबंधितांना येथे दिली. सद्य:स्थितीत या विमानतळाचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उडणार, याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीपथावरील कामाची पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी आले असता ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, गीता पिलाई, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय सिंह येनपुरे, उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करायची कुणाला भीती वाटतेय का? नामकरणावरून सुरू असलेली राजकीय रस्सीखेच अजूनही सुरू आहे का? का हे सगळं केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतांची ताटं वाढवण्यासाठी लटकवलेलं गाजर असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

नामकरण गुलदस्त्यात
लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीने सरकारदरबारी प्रश्न लावून धरला आहे. दरम्यान, एवढ्या थाटामाटात झालेल्या दौऱ्यानंतरही सर्वसामान्य जनतेला सर्वाधिक महत्त्वाचा असलेला प्रश्न विमानतळ प्रत्यक्षात सुरू कधी होणार? आणि त्याचं नाव काय असणार? याचे उत्तर अद्याप अनुत्तरित आहे. म्हणजेच, विमानतळाच्या प्रत्यक्ष सुरुवातीचा आणि नामकरणाचा विषय पुन्हा एकदा गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. सरकार विमानतळासह जनतेच्या संयमाचाही किती काळ छळ करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे याबाबत 16 जुलै 2022 रोजी केंद्र सरकारकडे ठराव पाठविण्यात आलेला आहे. दिबांचे नाव देण्यावरुन राज्य आणि केंद्र सरकार आजपर्यंत हो म्हणतेय, परंतु प्रत्यक्षात कोणतीही आधीसूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर जनतेतून संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर उद्घाटनापूर्वी आधीसूचना काढावी, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल. कारण, दिबांच्या नावासाठी जनता चातकासारखी वाट पाहात आहे.

– भूषण पाटील, सरचिटणीस, सर्वपक्षीय संघर्ष समिती

Exit mobile version