गटारे बांधून नंतर रस्त्याचे काम करावे; ॲड. सावंत यांची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
मोठा गाजावाजा करीत शिंदे गटातील आमदारांनी अलिबागजवळील चेंढरे गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र, जबदरस्तीच्या विकासाला चेंढऱ्यातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. गटारे गायब करून रस्ते करण्यात आले आहेत. नव्याने सुरू असलेल्या रस्त्याचे काम आवश्यक गटारे बांधून नंतर करण्यात यावे, अशी तक्रार ॲड. अरुण जगन्नाथ सावंत यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे भूमिपूजन स्थानिक आमदारांनी केले, पण त्याचे कार्यारंभ आदेश ना ग्रामपंचायतीकडे आहेत ना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहेत, अशी माहिती सावंत यांना संबधित कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.
सावंत यांच्या तक्रार अर्जानुसार चेंढरे शिवाजीनगर, म्हात्रे-सावंत-चाळके येथील रस्ता पावसाळयापूर्वी करण्यात आला होता. मात्र रस्त्यावरील पावसाचे पाणी जाण्याकरीता तेथे कोणतेही मार्ग ठेवलेले नाहीत. परिणामी पाणी तुंबून रस्ता खराब झाला आहे. मागील वर्षीं अनाधिकृतपणे केलेल्या रस्त्यामुळे, पावसात फुगलेल्या पाण्यामुळे आवारातील तसेच आजुबाजूच्या रहिवाशांच्या घरात पाणी पाझरून शिरत आहे. अनाधिकृतपणे केलेल्या रस्त्याचे बांधकाम त्याला कारणीभुत ठरत आहे. त्यामुळे हे कृत्य फौजदारीपात्र गुन्हयाच्या स्वरुपाचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. चेंढरे शिवाजीनगर-म्हात्रे-सावंत-चाळके यांच्या घरापर्यंत रस्ता उखडायला काही कामगार शनिवारी आले होते. त्यांच्या सुपरवायझरसोबत झालेल्या चर्चेत कामाचे कोणतेही पत्र नसल्याचे उघड झाले. अशी कामे ही आर्थिक गुन्हेगारीच्या स्वरुपाची आहेत. त्यामुळे त्याचा तपास होणे आवश्यक आहे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
आता पुन्हा गटारांच्या नियोजनाअभावी रस्ते तयार केले जात असल्याने नागरिकांच्या मालमत्तेबरोबरच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे अनाधिकृतपणे रस्त्याचे व रस्त्यात रॅम्पचे बांधकाम करणाऱ्या कृत्यास, वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. असे सावंत यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.