| श्रीवर्धन | वार्ताहर |
2016 साली राज्य शासनाच्या माध्यमातून श्रीवर्धन शहरामध्ये व समुद्रकिनार्यावर 72 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, 2020 साली झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये सर्व कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत. या घटनेला तीन वर्षे उलटून गेली असून, आजतागायत नगरपरिषदेला कॅमेरे दुरुस्ती करण्यात यश आलेले नाही. हे कॅमेरे राज्य शासनाने पर्यटन विकासनिधीमधून बसविले होते.
श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये असंख्य पर्यटक दिवसाकाठी श्रीवर्धनला भेट देण्यासाठी येत असतात. यामध्ये काही अनेक वेळा अपघातदेखील घडत असतात. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या अगोदर श्रीवर्धन शहरामध्ये भुरट्या चोर्यांचे सत्र खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होते. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर चोर्यांचे प्रमाण पूर्णपणे थांबले होते. मात्र 2020 साली झालेल्या भीषण निसर्ग चक्रीवादळामध्ये श्रीवर्धन शहरातील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त झाले. कॅमेरे उभे केलेले खांब त्याचप्रमाणे वायर्स तुटून आजतागायत नगरपरिषद प्रशासनाला सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी यश आलेले नाही. श्रीवर्धन येथे राज्यातील व देशातील लोकप्रतिनिधी आढावा बैठवा घेण्यासाठी येत असतात. मात्र, मागील तीन वर्षात कोणत्याही लोकप्रतिनिधीला या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करता आलेले नाही, असेच म्हणावे लागेल.
या सीसीटीव्हीचा डिस्प्ले नगरपरिषद कार्यालय श्रीवर्धन व पोलीस ठाणे या दोन ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. तरी श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.