दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत शनिवार, दि.16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शनिवारपासून आदर्श आचारसंहिता लागणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होणार आहे. देशभरात सात किंवा आठ टप्प्यात तर महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
देशभरातील निवडणुका किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. देशात सात टप्प्यात लोकसभांचे मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोग यंदा मतदान आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही नाविन्यपूर्ण घोषणा करणार का, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया महाआघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने बहुमत मिळवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. भाजपने 290 जागा मिळवत एकहाती बहुमत मिळवले होते. तर एनडीएच्या एकूण 339 जागा निवडून आल्या. यामध्ये जेडीयू, शिवसेना यासारख्या पक्षांचा समावेश होता.
विरोधी पक्षामध्ये यूपीए (आता इंडिया आघाडी) आहे. यामध्ये काँग्रेस 47 जागांसह प्रमुख विरोधी पक्ष आहे. याशिवाय द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकर), राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या पक्षांचा समावेश आहे.
काय आहे आदर्श आचारसंहिता
निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा होत असतानाच आदर्श आचारसंहिता लागू होते. त्यानंतर आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असते.
लोकसभा निवडणुकीमुळे आता संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे. आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेऊन तयार केली गेली नाही. सर्वच राजकीय पक्षांची मत आणि तज्ज्ञांचे मत घेऊन तयार केली आहे. त्यामध्ये वेळोवेळी बदलही होत असतात. देशात पहिली आचारसंहिता 1960 मध्ये झाली होती. केरळ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ही लागू करण्यात आली होती.
असे कारणे आचारसंहितेचे उल्लंघन
निवडणूक आचारसंहिते दरम्यान मतदारांना पैसे वाटणे, भेटवस्तू देणे, लालूच दाखवणे, आमिष देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच सरकारला विकासकामांची किंवा मतदारांवर प्रभाव पडले, अशी कोणताही घोषणा करता येत नाही.तसेच शासकीय अधिकाऱ्याची बदली करता येत नाही. अन्यथा ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई
एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्याही उमेदवाराकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाते. निवडणूक आयोग फौजदारी खटला दाखल करु शकतो किंवा निवडणूक लढवण्यापासून थांबवू शकतो. आचारसंहितेच्या उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्या तुरुंगवासाची शिक्षा होते. या काळात मतदारांवर दबाब आणणे, त्यांना धमक्या देणे ही बाबी आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत.
