अॅड. राकेश पाटील यांची गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
| रायगड | खास प्रतिनिधी |
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आचार संहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार करण्यात आली आहे. अलिबाग येथील अॅड. राकेश पाटील यांनी याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
अलिबागचे नाव बदलून ते मायनाक नगरी करावे आणि मायनाक भंडारी यांचे स्मारक अलिबाग येथे करावे अशा मागणीचे शिफारस पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां दिले आहे. त्यांची हि मागणी आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचे अॅड. राकेश पाटील यांनी तक्रारीत नमुद केले आहे. नार्वेकर यांच्या विरोधात अलिबागकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. अलिबागकरांनी या मागणीचा निषेध व्यक्त केला आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष, कान्होजीराजे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्यासह अन्य मान्यवरांसह सर्वसामान्यांनी तीव्र शब्दात फटकारले आहे. नार्वेकरांनी नाक खुपसू नये, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सहसचिव वैभव तारी यांनी प्रथम हि मागणी केली होती. याबाबतची मागणी त्यांनी नार्वेकरांना एका पत्राद्वारे केली होती. त्यावर नार्वेकरांनी तत्परता दाखवत मुख्यमंत्र्याना पत्र लिहीत मागणीची पुर्तता व्हावी अशी शिफारस केली होती. सदरचे पत्र हे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भंडारी समाजाला खुश करण्यासाठी देण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात निवडणूकीची आचार संहिता (दि.16) मार्च रोजी लागू झाली याचे ज्ञान आणि कल्पना नार्वेकर यांना होती. मुख्यमंत्र्याना जे पत्र दिले आहे. त्यावर 15 मार्च 2024 अशी तारीख असली, तरी 22 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री सचिवालय मध्यवर्ती टपाल केंद्रात हे दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. भंडारी समाजाने नार्वेकरांना जे निवेदन दिले आहे. त्याच्यावर 21 मार्च 24 अशी तारीख दिसत आहे. सदरच्या पत्रात नंतर खाडाखोड केल्याचे दिसत आहे, असे अॅड. पाटील यांनी नमुद केले आहे. अलिबाग या शब्दावरुन हिंदू-मुस्लिम वाद पेटवणे आणि त्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरण करुन 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकणे हा हेतू आहे. भंडारी समाजाच्या एक गठ्ठा मतांसाठी, राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्र्याना पत्र दिले आहे. नामांतराच्या मुद्यामुळेे अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील वातावरण कुलूषित होऊन असंतोष पसरला आहे. सदरच्या प्रकरणाची चौकशी करुन मतदारांवरती प्रभाव पडेल असे कृत्य करणे तसेच, निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभुत्व पाडल्यामुळे आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी राहूल नार्वेकरांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.