। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन रविवारी (12 जून) सकाळी 9 ते सायं 7 या वेळेत रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्स, शेलघर, उलवे नोड येथे करण्यात आले आहे. या शिबिरासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंथन शिबिराचे उदघाटन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे ,तारीक अन्वर, मुकुल वासनिक, के राजू, पृथ्वीराज चव्हाण, एच के पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनिल केदार, विजय वडेट्टीवर, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेत भाजपावर टीकास्त्र सोडण्यात आले. भाजपाला काँग्रेस पक्षच नमवू शकतो असे माळी यांनी सांगितले. तर जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी 2024 मध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसेल व राज्यात व जिल्ह्यात काँग्रेसचाच बोलबाला असेल असे सांगितले. यावेळी ओबीसी सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.