| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोव्हिड काळात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या वीमा योजनेला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत परिपत्रक काढले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत आणलेल्या आरोग्य कर्मचार्यांसाठीच्या वीमा योजना आणखी 180 दिवसांसाठी अर्थात सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. 19 एप्रिल 2022 पासून या वीमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. कोव्हिडच्या रुग्णांची काळजी घेणार्या आरोग्य कर्मचार्यांच्या कुटुंबियांना याची मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोव्हिड 19 काळात कर्तव्य बजावतांना कोविडमुळे मृत्यु पावलेल्या कर्मचार्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा कवच किंवा सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचे निर्देश शासनाकडून आले होते. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेचे कोव्हिड 19 काळात कर्तव्य बजावतांना कोविडमुळे मृत्यु पावलेल्या राजेश बागडे, लक्ष्मी गायकवाड आणि गणपत पाटील यांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाखाच्या धनादेशाचे वाटप डॉ. चौतमोल, विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, हर्षदा उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनानंतर रोजगारात वाढ
देशात कोव्हिड-19 संसर्ग कमी झाल्यानंतर कोलमडलेले आर्थिक चक्र पुन्हा एकदा रुळावर येऊ लागल्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. रोजगाराच्या संधीदेखील नव्याने निर्माण होऊ लागेल्या असून, अनेक कंपन्यांनी रोजगार भरतीमध्ये वाढ केली आहे. मार्च महिन्यात वार्षीक आधाराच्या डेटावर करण्यात आलेल्या एका विशलेषणाच्या अहवालानुसार रोजगाराच्या दरात 6 टक्के वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र पाहण्यात आले आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सने देशातील 13 शहरांमधील कंपन्यांच्या भरती डेटाचे विश्लेषण केले असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार रोजगार भरतीमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर असून, येथे मार्चमध्ये नोकरभरतीचा दर 21 टक्क्यांहून अधिक असल्याचे म्हटले आहे.