। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील राणेचीवाडी गावाशेजारी असलेल्या धरण नदीतील पाणी दूषित झाले असून मासेही मृत अवस्थेत आढळून आले आहेत. गावाशेजारून वाहणार्या नदीच्या पाण्याचा वापर येथील नागरिक उन्हाळी भाजीपाला पिकविण्यासाठी, पाळीव जनावरांना पिण्यासाठी देखील या पाण्याचा वापर केला जात होता. यांसह येथील आदिवासी बांधव या धरण नदीत जाळी फेकून मासेमारी करत असत. मासे विक्रीतून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला जात होता. सोमवारी काही शेतकरी आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले होते. परंतु त्याठिकाणी गुरे पाणी पित नाहीत म्हणून त्यांनी नदीचे पाणी पाहिले असता त्यांना नदीचे पाणी गढूळ व त्यातील मासे मृत्युमुखी पडले असल्याचे आढळून आले. नदीतील मासे पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी कोणीतरी औषध टाकले असावे व त्यामुळेच नदीतील मासे मृत्युमुखी पडून पाणी गढूळ झाले असावे असा अंदाज ग्रामस्थांकडून लावला जात आहे. यामुळे नदीपात्रातील मासे मृत पावल्यामुळे आता येथील आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे कृत्य करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.