। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
साळाव पुलाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील जनतेसाठी साळाव पोलीस चौकीपासून मुरुड एसटी वाहतूक सुरु ठेवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. याबाबत पक्षाच्यावतीने प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे.
अलिबाग-मुरुड मार्गावरील साळाव येथील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरुन गेल्या दोन दिवसांपासून एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी रोहामार्गे एसटी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. हा मोठ्या अंतराचा वळसा बसणार असल्याने त्याचा मोठा भुर्दंड मुरुडकर एसटी प्रवाशांना बसणार आहे. त्याचप्रमाणे वेळदेखील वाया जाणार आहे. याबाबत पर्याय म्हणून साळाव पोलीस चौकीपासून मुरुड एसटी वाहतूक सुरु ठेवता येऊ शकते. तसेच पुढे रेवदंडा बसस्थानकापासून अलिबाग असा मार्ग करता येऊ शकतो. काहींनी मिनीबस सुरु करा, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यासाठी मिनीबस अलिबाग आगारात आणाव्या लागतील. तसेच खासगी मिनीबस सुरु केल्या तर प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे मुरुडकरांची होणारी असुविधा टाळण्यासाठी पर्याय म्हणून साळाव पोलीस चौकीपासून मुरुड बस सुरु केल्यास एसटी सुरु राहील. केवळ साळाव पूल नागरिकांना ओलांडून जावे लागेल किंवा तेवढ्या अंतरासाठी खासगी वाहतूक सुरु ठेवता येऊ शकेल, असे शेकापक्षाने म्हटले आहे.