| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमध्ये आजही बैलगाड्या चालत आहेत. ग्रामीण भागात भातशेतीची सर्वच कामे ही बैलगाडीच्या सहाय्याने केली जात आहेत. बदलत्या काळात जरी वाहतुकीची साधने वाढली असली तरीसुद्धा शेतीच्या कामासाठी बैलगाडी अग्रेसर ठरत आहे. यामध्ये शेतातील भारे वाहणे, भात भरडणे, शेतामध्ये शेणखत टाकणे त्याचबरोबर वाहतुकीच्या कामासाठी वापर होत आहे. यामुळे शेतकर्यांच्या प्रत्येक कामात बैलगाडीचे मोठे योगदान ठरत आहे. शिवाय, इंधनाची बचत होत असते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाहनांचा वापर वाढल्यामुळे बैलगाडी कालबाह्य होत आहे.
गेल्या काही वर्षामध्ये भातशेतीचे विभाजन झाले असून, त्याचबरोबर बहुतेक शेतजमिनीवर औद्योगिक कारखाने निर्माण झाले असून, त्यामुळे भातलागवड क्षेत्र कमी होत चालले आहे. त्याचबरोबर दरवर्षी नैसर्गिक प्रकोप यामुळे भातशेतीमध्ये टाकलेला पैसा वसूल होत नसल्यामुळे शेतकर्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. शिवाय, आजची तरुण पिढी शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे तालुक्यातील बहुतेक भातलागवडीची जमीन ओस पडल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
याचबरोबर गुरे सांभाळणे म्हणजे प्रथम त्यांच्या चारा, पाणी सोय करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात निर्माण होणारे गवत सुकले की गुरांचे खाद्य म्हणून वापरले जाते. मात्र, त्यालासुद्धा वणवे लावून दिले जात असल्यामुळे गुरांच्या खाद्याचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. या सर्व बाबींमुळे बैलगाडी जवळजवळ हद्दपार होत चालली असली तरीसुद्धा ग्रामीण भागत शेतीच्या कामासाठी बैलगाडी अग्रेसर ठरत आहे.